Friday, January 3, 2014

थोडा उजेड ठेवा...

नवीन वर्षात प्रवेश करताना थोडे मागे वळून पाहिले तर  आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांचे भयाण वास्तव डोळ्यांसमोर तरळते. दरवर्षी या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी दुपटीने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे  ही बाब समाजाच्या दृष्टीने qचताजनक आहे. गेल्या १६ डिसेंबरला दिल्लीत एका मेडिकलच्या विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशाला हादरवून सोडले. त्यानंतर देशातील महिलांमध्ये जागृतीची लाट आली. शिवाय महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधात कायदाही करण्यात आला. पण दुर्दैव असे की, या कायद्याची अंमलबजावणीच प्रभावीपणे झाली नाही. उलट देशात मुली, महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढच होत गेली. महिलांवर केवळ लैंगिक अत्याचारच होत नसून इतर प्रकारचेही भयानक अत्याचार होत आहेत. बलात्कारासह विनयभंग, छेडछाड, घरगुती qहसा, मानसिक शोषण, हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ, मारहाण,  क्रूर हत्या, महिलांचे अपहरण करणे, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा अमानुष अत्याचारांचा उल्लेख करावा लागेल. स्त्री-पुरुष
समानतेच्या थापा मारणाèयांकडूनही महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना काही कमी नाहीत. आपण सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली. झोपडी जाऊन बंगले आले, सायकल जाऊन चारचाकी आली,  आपण शिकलोही; पण पुरुषप्रधान संस्कृतीचा मेंदूतील पगडा काही कमी झालेला दिसत नाही. जिला जगत्जननी, घरातील लक्ष्मी संबोधले जाते, तिचा बहुतांश ठिकाणी अवमान केला जातो आहे. तिला जाळून मारले जात आहे. राज्यात दररोज ४४ महिला बलात्कार, अपहरण, पती व नातेवाईकांच्या छळाने ग्रस्त असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तर दररोज पाच महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. आपले राज्य महिलांवरील अत्याचारांत सहाव्या क्रमांकावर आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे चित्र आहे. हुंडाबंदी असतानाही ३२९ आणि पती व नातेवाईकांकडून छळाची ७ हजार १५ प्रकरणांची नोंद झालेली आहे. परवा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात अशीच एक अमानवी घटना घडली. डोंगरकिन्ही गावातील ज्ञानेश्वर घोडके नामक इसमाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सुनीताला तिच्या दहावर्षीय मुलीसह कारमध्ये जिवंत जाळले. यात त्या माय-लेकीचा जळून अक्षरश: कोळसा झाला. काही दिवसांपूर्वी लातूरच्या जळकोट तालुक्यात एका महिलेला भररस्त्यात अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले. एका अहवालानुसार हुंड्यासाठी हत्या करण्याच्या घटना सर्वांत जास्त प्रमाणात भारतातच घडतात.  देशात दरवर्षी ५० लाख मुली पंधरा वर्षांच्या वयातच ठार करण्यात येतात. भू्रणहत्येचा आकडा तर आता लाखांच्या घरात गेला आहे. याचे कारण केवळ ‘मुलगी नकोङ्कही मानसिकता.  ही वास्तविकता मनाचा थरकाप उडविणारी आहे.  घराची लक्ष्मी समजणा-या भारतीय संस्कृतीत स्त्रियांची अशी दयनीय अवस्था निश्चित काळीज फाडणारी आहे. सासुरवास ही आपली क्रूर परंपराच बनली आहे. आधुनिक काळातही ही परंपरा चालूच आहे. का घडतात अशा घटना? महिलांवरील अत्याचार कमी का होत नाहीत? परिवर्तन आणि पुरोगामीपणाच्या कृतिशून्य थापा मारणा-या तथाकथित समाजसेवक,
बुद्धिवादी आणि सरकारकडे याची काय उत्तरे आहेत? महाराष्ट्रात तर अनेक वर्षांपासून राज्य महिला आयोगाला अध्यक्षच नसल्याने पीडित महिलांनी दाद कुठे मागावी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरून कोणी आंदोलन करताना दिसत नाही. हे समाजमनाच्या संवेदना बोथट झाल्याचेच द्योतक आहे. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. त्यासाठी किमान या नव्या वर्षात तरी सगळ्यांनी अत्याचारमुक्त सुराज्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्वत्र अंधार पसरला असला तरी मानवतेची  पणती जपून उजेड ठेवण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.

                                                                                       पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate