Thursday, March 21, 2013

आसाराम बापूंची बेबंद धुळवड



पूर वा दुष्काळासारखे समाजावरील कोणतेही संकट असो, अशावेळी ज्यांचे हृदय पिळवटून निघते, जे समाजासाठी धावून येतात, मानसिक आधार देतात शिवाय समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करीत चांगल्या मार्गावर चालण्याचा संदेश देतात तेच खरे संत अशी आपली सर्वांची धारणा असते. पण आसाराम बापू सारख्या स्वयंघोषित वादग्रस्त अशा हायटेक साधुकडे पाहीले की, संत शिरोमणि तुकाराम महाराजांच्या  भोंदू साधुंवरील अभंगाची  आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज  एका  अभंगात म्हणतात-
ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनि म्हणती साधु
 अंगा लावूनिया राख,  डोळे झाकून करती पाप
 दावूनि वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती.
 तुकाराम महाराजांनी पाखंडी साधुंबद्दल केलेले वर्णन आसाराम बापूंना तंतोतंत लागू होते. सतत वादाच्या भोव-यात राहणा-या आसाराम बापू ने आपली वर्तवणूक आणि वक्तव्यावरुन पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती भीषण असताना, आसाराम बापूंनी नाशिकनंतर नागपूर आणि नवी मुंबईत लाखो लिटर पाण्याची नासाडी करुन होळी साजरी  केल्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया घालविताना या बापूंना थोडाही संकोच वाटत नाही हे विशेष. अशा लोकांना साधू कसे म्हणायचे हा प्रश्नच आहे. हे बापू तर साधुच्या वेषातील भोगी आहेत. आसाराम बापू आेिण त्यांचे शिष्य नगरपलिकांकडून पाणी मागवून होळी खेळत आहेत. इतकेच नाही तर त्यांना या पापाची जाणीव करुन दिलेलीही आवडत नाही. म्हणून त्यांना त्याची जाणीव करुन देणाèया पत्रकारांवर हल्ले करीत आहेत. होळी  आठ दिवसांवर असतानाच आसाराम बापूंनी महाराष्ट्रात होळीचे रंग उधळून दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. एवढेच नाही तर या साधुने ते खेळत असलेल्या होळीचे उद्धटपणे समर्थनही केले आहे. बापूंच्या शिष्यांना तर बापूंसोबत होळी खेळली की आपल्या आयुष्याचे कायमचे कल्याण होईल, असेच वाटते.  साधु बापूंनी होळी खेळण्याचे नवे तंत्र शोधून काढले आहे. ते व्यासपीठावर उभे असतात आणि हातात हायप्रेशरने हजारो लीटर पाणी एकदम उडविण्याची क्षमता असलेला पंप असतो. या पंपाद्वारे ते समोर जमलेल्या आपल्या भक्तांवर रंगीत पाण्याचे फवारे उडवतात आणि यातून त्यांच्या भक्तांना फार मोठे पुण्य मिळाल्यासारखे वाटते. पण असे करताना लाखो लिटर पाणी वाया जाते, याचे भान ना बापूंना ना त्यांच्या भक्तांना. अशी होळी त्यांनी नागपुरातील कस्तुरचंद पार्कच्या मैदानात आणि नवी मुंबईतील एरोली भागात बेजबाबदार आणि बेबंद धुळवड साजरी केली. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे, हे त्यांच्या गावीही नव्हते. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने बापूंच्या या धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरविले होते. आसाराम बापूंच्या या बेजबाबदार कृतीचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही निषेध केला आहे. मुंबईतही  नवी मुंबई मनपाने आसाराम यांच्या धुळवडीला पाणी देण्यास नकार दिल्याने बापूंच्या शिष्यांनी पत्रकारांवर जबर हल्ले केले. त्यात अनेक पत्रकार जखमी झाले. एवढे होऊनही आसारामभक्तांनी ठाण्याहून पाणी आणून धुळवड साजरी केलीच. हा निर्लज्जपणाचा कळस नव्हे तर काय? पाणी वाया घालविल्याचा या संत म्हणणाèया महाभागाला जरासुद्धा पश्चाताप नाही. उलट आपण काही चूकीचे केले नाही, प्रसारमाध्यमे  आपल्याविरुद्ध अपप्रचार करीत आहेत आणि आपण यापूढेही ठरल्याप्रमाणे धुळवड साजरी करु, असे उद्धटपणे जाहीर केले. आसाराम यांच्या धुळवडीवर संतप्त भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने आसाराम बापूंच्या होळी कार्यक्रमांवर बंदी घातली खरी पण ती जुमानतील ते बापू कुठले? त्याच्या विपरित वागण्यामुळे अनेकवेळा  त्यांच्यावर टीकेची झोडही उठलेली आहे. यापूर्वी बापूंनी भक्ताला लाथ मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले, शिवाय त्यांच्या आश्रमात घडलेल्या काही संशयास्पद मृत्यूंमुळे त्यांच्या भोवती आणि त्यांच्या आश्रमाभोवती संशयाचे धुके निर्माण झालेले आहेच. तसेच दिल्लीत बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारासंदर्भातही त्यांनी या बलात्काराला ती तरुणीच जबाबदार असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. वृत्तपत्रांनीही बापूंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला होता. पण त्यानंतर बापू म्हणाले, वृत्तपत्रे ही कुत्रीच आहेत, ती भुंकणारच, तर अशा प्रकारच्या विचित्र साधुचे संयम, विवेकqकवा सामाजिक भान याच्याशी कोणतेही नाते नसल्याचेच दिसून येते. अशा आसाराम बापूंना पाणीटंचाई आणि पाणीबचतीचे भान राहीलेले नाही. सद्या महाराष्ट्रात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावा-गावातल्या विहीरी, कुपनलिका, नद्या-नाले आटले आहेत. राज्यातील धरणांत अवघा ३७ टक्केच पाणी उरले आहे. पाण्याच्या संकटाला तोंड कसे द्यायचे, हीच qचता राज्यकर्ते, प्रशासन आणि लोकांना लागून राहीली आहे. अशा संकटकालिन स्थितीत कोणी लाखो लिटर पाणी वाया घालवित असेल तर लोक गप्प बसतील कसे ? पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा अपव्यय करणाèयाविरुद्ध एनएमसी पाणी कायदा कलम ३० (१/सी) अन्वये कारवाई केली जाऊ शकते दोषी व्यक्तीची नळ जोेडणी कायमची तोडण्याची तरतूदही या कायद्यात आहे. या कायद्यानुसार आसाराम आणि त्यांच्या शिष्यांविरुद्ध  सरकारने करायला हवी. ही लोकांची रास्त अपेक्षा आहे. कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करुन दोषींना मोकळे सोडले जाईल, पण आगामी काळात  निर्माण होणाèया भीषण टंचाईचे काय, अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी  अशा कार्यक्रमांवर देशभर बंदी आणली पाहीजे. अशा आसाराम बापूंसारख्या ढोंगी साधु-बाबांमुळे जगभरात आपल्या देशाची खिल्ली उडवली जात आहे. उच्चशिक्षित लोक सुद्धा आसारामसारख्या ढोंगी साधुंच्या बहकाव्यात येऊ न कसे फसतात, याचेच आश्चर्य वाटते. लोकांनी सारासार विचार करुन श्रद्धेचा बाजार मांडणाèया अशा साधुंच्या नादी लागणे हे शिक्षण शिकूनही अडाणीपणाचेच आहे. सध्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना आसाराम सारख्या भोंदू बापूने अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी करणे, हे केवळ निषेधार्हच नाही तर qनद्य आहे. महाराष्ट्रातील जनता आसाराम बापूंच्या या लिला कदापी सहन करणार नाही. पण आपला तो बाब्या आणि दुसèयाचे कार्टे असेही होऊ नये. कारण दैनंदिन जीवनात बहुतांश लोक पाण्याचा अपव्यय करताना दिसतात.आपल्या महागड्या गाड्यांवर बसलेली धूळ पुसण्यासाठी पाईपमधून पाण्याचे फवारे उडवणारे, बंगला धुण्यासाठी शेकडो लिटर पाण्याचा वापर करणारे, टाकी ओव्हर फ्लो होत असतानाही तासाभरानंतर बंद करणारे, रोजच्या रोज गॅलरीत पाणी ओतणारे, उन्हाळ्यात गच्ची तापते आणि त्यामुळे उकडते, असे कारण देत संध्याकाळी गच्चीवर पाणी मारणारे असे अनेक आसाराम आपल्या शेजारीही आहेत. कधी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तर कधी निषेधाचा सूर काढून गप्प बसतो. अशा लोकांनाही  चाप लावण्याची गरज आहे.

                                                                           -- शिवाजी कांबळे, लातूर
                                                                                  ९०११३०८५८०

Wednesday, March 13, 2013

निखा-यासारखं व्यक्तिमत्त्व




--------------------------------
आयुष्यात यशस्वी होण्याची ज्यांची इच्छा असते  आणि ज्यांना स्वत:मध्ये काही बदल करायचे असतात, ज्यांना नव्या जगात झेपायचे असते, त्यांच्या आयुष्याचे शंभर नंबरी सोने होते. त्यासाठी अपार कष्टाचे, स्वतावरील विश्वासाचे बळ असावे लागते. तसे बळ असलेले, प्रतिकुल परिस्थितीवर स्वार होऊन यशस्वी वाटचाल करणारे लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी गायकर या व्यक्तिमत्वाबद्दल...
------------------------------
आईवडीलांचे संस्कार आणि परिश्रमामुळच माझं आयुष्य घडत गेलं. शेतात गुरा-ढोरांमागं जाऊन आणि वस्तीगृहात राहून शिक्षण  घेतलं. शिक्षणानचं माझ्यात बदल झाला. तुम्हीही  जिद्दीन ंशिक्षण घ्या, असं लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर हे सानेगुरुजी शाळेच्या  वार्षिक स्नेहसंमेलनात तळमळीने सांगत होते. समोर बसलेले विद्यार्थी-पालक त्यांचे भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या मंचावरच गायकर आणि माझी पहिल्यांदाच भेट झाली. त्यानंतर आवर्जून त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून त्यांचे निखा-यासारखे तत्त्वनिष्ठ असणारे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते पुढे आले. बी. जी. गायकर अर्थात बाळशिराम गणपत गायकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिराचीवाडी या लहानशा खेडयातले. आई-वडील निरक्षर, शेतीव्यावसाय करुन     कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. गायकर यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण वाडीतच झाले. तर सातवीपर्यंतचे शिक्षण ब्राम्हणवाड्यात तर दहावीपर्यंतचे शिक्षण ओतूरच्या संत गाडगे महाराज आश्रमशाळेत झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी संगमनेरला  गरीबांसाठी असलेल्या वस्तीगृहात राहुन पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी पडेल ती कामे केली. वस्तीृहात सरपण फोडणे, दळण आणणे, हाताने स्वयंपाक करणे, भाजीपाला आणणे, झाडलोट करणे, अशी कामे करावी लागत. भूगोल विषयात ७४ टक्के गुण मिळवूनही कुठे नोकरी लागत नव्हती, म्हूणन गावाकडे जाऊन घरची जनावरे राखायचे काम केले. दरम्यानच्या काळात गावातीलच विकास सोसायटीत त्यांनी महिनाभर नोकरी केली. पण तिथे न पटणा-या गोष्टी घडत होत्या म्हूणून ती नोकरी सोडून दिली. मनात शिक्षणाचा ध्यास असल्याने आणि स्वत:चे आस्तिव निर्माण करण्याच्या जिद्दीने त्यांनी पुणे गाठले. पुण्यात राहायची सोय नव्हती, परंतु विज्ञान शाखेचे विभागप्रमुख डॉ. शिरगुरकर यांनी त्यांना मदत केली. पण या मदतीच्या मोबदल्यात त्यांनी गायकर याच्याकडून लेखी लिहून घेतले की, मी खूप अभ्यास करीत आणि विद्यापीठात पहिला येईल म्हणून. त्यानंतर त्यांची राहायची सोय झाली. कसेबसे  एस.पी. महाविद्यालयात एम.ए.ला अ‍ॅडमिश मिळाले. देना बँकेत काम करुन आणि महाविद्यालयात गरीब विद्याथ्र्यांसाठीचा निधीतून मदत मिळाल्याने शिक्षणासाठी आधार मिळाला.त्यांनी एमएला विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला. डॉ. शिरगुरकर यांची प्रेरणा हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरला. तुम्ही जेव्हा मोठे अधिकारी व्हाल, तेव्हा तुमच्या सारखे गरीब तुमच्याकडे मदतीसाठी येतील, त्यावेळी तुम्ही त्यांना मदत करावी, म्हणूनच मी लेखी घेतले होते, असे शिरगुरसरांनी नंतर स्पष्ट केले. हे सांगताना गायकर भावूक झाले. एम.ए. नंतर गायकर यांनी रुरल डेव्हलपमेंट प्लॅqनगचा कोर्स केला. आर्थिक चणचण कायम होती. त्यामुळे विद्यापीठात जेवण स्वस्तात मिळायचे म्हणून तीन किमीवरुन तिथे यायचे. दरम्यानच्या काळात एनडीएमध्ये दोन वर्षे गायकर यांनी लेक्चरशिप केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. स्वत:च टीपण काढणे, सराव करणे, इंग्रजी भाषेवर कमांड मिळविले. टॉपिकवरुन विविध लेखकांची पुस्तके घेतली. खूप पुस्तके रेफर केली. शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. तास न् तास ग्रंथालयात बसायचो. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी विषयाची तयारी केली. परीक्षेत कमी वेळात जास्तीत जास्त मांडता आले पाहिजे, त्यासाठी खूप अभ्यास केला. त्यामुळेच एमपीएससीमध्ये यश मिळाले. असे गायकर सांगतात. बीडीओ म्हणून नगरला जॉईन झाले. ते स्पर्धा परीक्षा सतत देत राहीले. त्यांना उपजिल्हाधिकारी होण्याची आकांक्षा होती. पण त्यावेळी डीवायएसपी पदालाही क्रेझ होती. १९८४ मध्ये त्यांची ठाणे ग्रामीणचे डीवायएसपी  म्हणून निवड झाली. त्यानंतर पनवेल, अंबाजोगाई नंतर सीटीएसडीपीओ म्हणून १९९५-९६ ला लातूरला सेवा केली. पुणे लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्य बजावले. पुन्हा लातूरला अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणून १९९८ ला रुजू झाले. नाशिक, भंडारा येथे पोलिस अधिक्षकपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर २०११ पासून ते लातूरचे पोलिस अधिक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. ते आजच्या युवकांना सांगतात, अभ्यासाची सवय, परिस्थितीवर मात करण्याची तयारी, शिवाय डिव्होशन, जिद्द असल्यास यश निश्तिच मिळते.
                                                                                ---- शिवाजी कांबळे,
                                                                                      लातूर
                                                                                   ९०११३०८५८०







मराठवाड्याची उपेक्षा कायमच!



---------------------
केंद्रीय आणि रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याचा भ्रमनिराश झाला. दुष्काळ निवारणासाठी राज्याला निधी वाटप करताना मराठवाड्याच्या वाट्याला निधी स्वतंत्रपणे द्यावा, अशी मागणी असताना बुधवारी केंद्राने जाहीर केलेल्या १२०७ कोटींच्या मदतीत मात्र मराठवाड्याचा विचारही करण्यात आला नाही. त्यात भर म्हणून की काय दुष्काळावरुन उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचे राजकारण सुरु झाले. दुष्काळग्रस्तांच्या हालअपेष्टा होत असताना सत्तेचे आणि विरोधाचे राजकारणच अधिक केले जात आहे... आता राज्याच्या अर्थसंकल्पात तरी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी किमान अपेक्षा मराठवाडावासीयांची आहे.
------------------------


मराठवाड्याच्या माथी बसलेला मागासलेपणाचा शिक्का अजूनही  पुसला गेलेला नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागातील टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. १४ हजार कोटींचा अनुशेष अद्याप भरुन काढण्यात आलेला नाही. या स्थितीला या भागातील निष्क्रिय नेतृत्वही तेवढेच जबाबदार आहे. विकासाची दृष्टी असलेले शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर विलासराव देशमुख हे दोन मुख्यमंत्री अपवाद सोडले तर इथल्या राजकिय नेतृत्वात प्रगल्भता दिसून आली नाही.त्यांच्यानंतर मात्र ख-या अर्थाने मराठवाडा पोरका झाला आणि विकासाचा अनुशेष कायम राहीला. मागील कांही वर्षांत मराठवाड्याचा विकास क्षीण झाला. अनुशेष संपल्याचे काहीजण म्हणतात. पण आठही जिल्ह्याचा समान विकास झालाच नाही. नागपूर करारानुसार मराठवाड्याला झुकते माप मिळायला हवे होते, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. कारण मराठवाड्यातील प्रश्नावर आवाज उठविणारे, राज्य आणि केंद्राचा निधी खेचून आणणारे नेतृत्व राहीले नाही. लोकप्रतिनिधी , नेत्यांमध्ये कमालीची उदासीनता असल्यामुळे मराठवाड्याच्या माथी उपेक्षा आली. महाराष्ट्राच्या तिजोरीत मराठवाड्याचा हातभार मोठा असतानाही या भागाच्या संदर्भात राज्य शासनाचा हात नेहमीच अखडता असतो असा नेहमीचाच अनुभव आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, या भागातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मराठवाड्याची उपेक्षा कायमच आहे. निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्यापासून अगदी पद्धतीशीरपणे मराठवाड्यावर अन्याय करण्याची परंपरा तशीच पुढे सुरु आहे. सद्या महाराष्ट्रातील दुष्काळात मराठवाड्याच्या दुष्काळाची भीषणता सर्वाधिक आहे. जिवापाड जपलेल्या फळबागांचे सरपण झाले, विहिरी कोरड्या पडल्याने ऊसाचा खोडवाही शेतक-यांनी नांगरुन काढला, येथील लोकांचा दिवस उगवतो तो पाण्यासाठी आणि मावळतो तो पाण्यासाठी, क्षितिजापर्यंत कुठेच गवत नसल्याने शेळ्या-मेंढ्याची रानोमाळ भटकंती होत आहे.

 चारा नाही म्हणून जनावरे खाटकांना विकण्याची वेळ आली. अशी भयाण अवस्था दुष्काळाने मराठवाड्याची करुन ठेवली आहे. १९७२ पेक्षाही भयाण दुष्काळी स्थिती यावर्षी मराठवाड्याच्या नशिबी आली आहे. ७२ च्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई होती, पण यावर्षीच्या दुष्काळात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  लहानमोठ्या धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा उरला आहे. पुढील एक ते दीड महिना पुरेल इतकेच हे पाणी आहे. त्यानंतर करायचे काय? हा मोठा प्रश्न आहे. जसजसी उन्हाळ्याची तीव्रता वाढेल तशी मराठवाड्यघातील धरणे कोरडी ठणठणीत पडतील. स्थलांतर वाढेल, सर्वत्र हाहाकार होईल. पण याचे सोयरसुतक आहे कोणाला?  १९७२-७३ च्या  त्या दुष्काळात  एकमेकांच्या विरोधात खडाजंगी करणारे तेव्हाचे सत्ताधारी आणि विरोधक दुष्काळ निवारणात आपसी मतभेद विसरुन एकत्र आले. तसे  चित्र आज दिसत नाही. दुष्काळासारख्या भयाण संकटावर मात करण्यासाठी ठोस कृती करण्याऐवजी या भागातील नेतेमंडळी सत्तेच्या आणि विरोधाच्या राजकारणातच मश्गुल असताना दिसतात. तर दुष्काळग्रस्त qकवा उपासमारीने त्रस्त असलेले सर्वसामान्य लोक आशाळभूत होऊन  सरकारच्या मदतीकडे आस लावून आहेत. पण आजच्या राज्यपातळीवरच्या नेत्यांनी  दुष्काळग्रस्त भागाला राडाभूमी करुन टाकले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसेचे  राज ठाकरे या दोघांनी तर दुष्काळी स्थितीचे भान विसरुन एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्याच्या राजकारणातच धन्यता मानली.दुष्काळग्रस्तांच्या व्यथा राहिल्या बाजूला आणि यांचीच तिरगा-मिरगी सुरु झाली. मध्यंतरी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्यात येऊन दुष्काळी भागाची पाहणी केली. परंतु पवारांनी या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी ठोस अशी कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे मराठवाडावासीयांची निराशा झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौ-यात दुष्काळ निवारणासाठीच्या निधीचा प्रस्ताव पूर्वीच केंद्राकडे पाठविल्याचे सांगितले.
 या नेत्यांमधील परस्पर विरोधी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे दुष्काळग्रस्तांच्या समस्या अडगळीतच पडल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधारी अजून कितीकाळ जनतेच्या भावनांशी हा असा कु्रर खेळ खेळणार आहेत? शिवाय दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात आलेले केंद्रीय पथकही मोघम पाहणी करुन आणि पाहुणचारावर ताव मारुन  आले तसे निघून गेले. दरम्यान या भागातील दुष्काळ निवारणासाठी किमान १२०८  कोटी रुपयांचा प्रस्ताव औरंगाबादच्या विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केंद्रीय पथकाकडे सादर केला. विशेष म्हणजे दुष्काळ निवारणासाठी राज्याला निधी वाटप करताना मराठवाड्याच्या वाट्याला निधी स्वतंत्रपणे द्यावा, अशी मागणीही या प्रस्तावात करण्यात आली. परंतु १३ मार्चला केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळनिवारणासाठी एकूण १२०७ कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली.  राज्याने दुष्काळावर मात करण्यासाठी २२०० कोटींची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र १२०७ कोटीं ही अपुरी मदत जाहीर केल्याने. यातून मराठवाड्याच्या वाट्याला  कितपत मदत मिळते. याबद्दल सांशकताच आहे.
 दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत स्थलांतरीत होणाèया मराठवाड्यातील लोकांना तात्पुरते रेशनकार्ड द्यावे, मराठवाड्यात चारा छावण्या मोठया प्रमाणात उभारण्यात याव्यात, रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांच्या रोजगारात वाढ करावी, अशा सूचना शरद पवार यांनी गेल्या पंधरवड्यात मुंबईत झालेल्या खासदारांच्या बैठकीत केल्या. पण त्या सूचनांचे पुढे काहीच झाले नाही. आता १९ मार्च रोजी सादर करण्यात येणाèया राज्याच्या अर्थसंकल्पात तरी मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी भरीव तरतूद करण्यात येईल का? याबद्दलही शंकाच आहे. मराठवाड्यातील दुष्काळाकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देवून दुष्काळी कामे व पाणीपुरवठासाठी तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा येथील पामर जनतेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी भरीव तरतूद केल्यास या भागातील दुष्काळावर ती फुंकर ठरेल हे निश्चित. दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने जायकवाडीचे हक्काचे पुरेसे पाणी न सोडून शासनाने या भागावर अगोदरच अन्याय केला आहे. त्यात पुन्हा दुष्काळासाठी उपलब्ध निधीतील नगण्य वाटा मराठवाड्याला मिळाला. पूर्णा नदीवर खडकपूर्णा, पैनगंगेवर पेनटाकळी व गोदावरीच्या उध्र्व भागात असंख्य नियमबाह्य धरणे बांधून आधीच मराठवाड्याची मुस्कटदाबी करण्यात आलेली आहे. 
आता दुष्काळाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद येथील सर्वसामान्यांचे जगणे कष्टमय झाले आहे. मरोह योजनेमार्फत निधीची तरतूद करुन तलाव व धरणातील गाळ काढणे, शेतरस्ता, शेततळी, विहीर खोदकाम, जलसंधारण इत्यादी कामे शासन खर्चाने ताबडतोब मोठ्या प्रमाणात सुरु करावी. टँकरची संख्या वाढवावी, गारपीट व अवकाळी पावसाने ग्रस्त शेतक-याना नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना किमान दिलासा तरी मिळू शकेल. अन्यथा न्यायासाठी हातात दंडुके घेऊन लोक रस्त्यावर उतरले तर राज्यकत्र्यांना पळता भूई थोडी होईल. हे  कोणी भविष्यवेत्त्याने सांगण्याची गरज नाही.

                                                                              -- शिवाजी कांबळे, लातूर
                                                                                ९०११३०८५८०















Translate