बुरसटलेल्या विचारांचे राजेश्वरराव
मी ‘एकमतच्या २५ डिसेंबरच्या अंकात वाचक कट्यामध्ये अस्पृश्यता पाळणारी श्यामची आई, या मथळ्याखाली एक पत्र लिहिले होते. पावित्र्याच्या मखरात बसविलेली शामची आई कशी अस्पृश्यता पाळणारी, जातीयवादी होती, हे मी पुराव्यानिशी त्या पत्रात दिलेले आहे; पण माझ्या एका पत्रामुळे पेठ, परळी वैजनाथ येथील बुरसटलेल्या आणि मनुस्मृतीचा समर्थक असलेल्या राजेश्वर देशमुखांचा जळफळाट झालेला दिसतोय. त्यांनी १५ जानेवारी २०१३ च्या ‘एकमतङ्कच्या अंकात काकदृष्टीचे असहिष्णु कांबळे या मथळ्याखाली कालसापेक्षतेच्या नावाखाली चातुवण्र्य व्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे समर्थनच केले आहे. माझ्या मूळ पत्राशी कसलेही ताळतंत्र नसलेले दाखले देऊन जे काही त्यांनी विद्वतेचे दिवे पाजळले आहेत तेच सत्य आहे, असा चुकीचा संदेश वाचकांत जाऊ नये म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. माझ्या पत्रात देशमुखांना नेमके काय खटकले? हे त्यांनी सांगितलेले नाही. मी सानेगुरुजींच्या सामाजिक आणि संस्कार चळवळीतील योगदान नाकारलेले नाही; पण याचा अर्थ असा नव्हे की, सानेगुरुजींच्या साहित्यकृतीवर, टीका वा चर्चाच होऊ नये. बाबा वाक्य प्रमाणम् हे कसे चालेल? कोणत्याही घटनेचा व प्रसंगाचा विचार माण-साने कालसापेक्षच केला पाहिजे, असे ते नमूद करतात. याचाच अर्थ इतिहासात जी अस्पृश्यता पाळली जात होती, दलितांना महारोग्यांसारखी वागणूक मिळत होती, ते काळानुरुप योग्यच होती. त्यामुळेच श्यामच्या आईला अस्पृश्यता पाळावी लागली, असा बालिश युक्तिवाद देशमुखांनी केला आहे. यातून श्यामची आई अस्पृश्यता पाळत होती हेही त्यांनी ओघाने कबूल केले आहे. देशमुखसाहेब, महापुरुष वा इतिहासातील आदर्शांचे विचार कधीच कालसापेक्ष नसतात. ज्यांच्याकडे प्रवाहाविरुद्ध जाण्याची निर्भयता असते, अनिष्ट रूढी-परंपरांचे चक्रव्यूह भेदण्याची ज्यांच्याकडे जिगर असते तीच माणसे महामा-नव बनतात. सर्वांनाच तेवढी प्रतिभा नसते qकवा समाजाचे नेमके आकलन करून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळेच महामानवाने शोधलेल्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न लोक करीत असतात. आजही आपण महापुरुषांच्या विचारांचे, प्रसंगाचेच दाखले देत असतो.
जसे तुम्ही तुमच्या पत्रातही संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांचे दाखले दिले आहेत पण ते चुकीच्या पद्धतीने दिले आहेत. माझ्या मूळ विषयाशी त्याचा काहीएक संबंध नसलेले. देशमुख यांच्या पत्रावरून हेच सिद्ध होते की, आजही मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती अजूनही जिवंत आहे. ते सरळ सरळ समतेचा तिरस्कार आणि विषमतेचा पुरस्कार करतात. दोन-चार दलित मित्रांना घरी नेऊन जेऊ घातले हे सांगणे हीसुद्धा अस्पृश्यतेचीच भावना आहे. या प्रसंगाचे भांडवल करून आपणही पुरोगामी हेच कदाचित त्यांना सांगावयाचे असेल. देशमुखसाहेब यातून आपण फार मोठे समाज परिवर्तन केलेत त्याबद्दल आपले अभिनंदनच केले पाहिजे. मनुवाद्यांनी निर्माण केलेली चातुवण्र्य व्यवस्था, भेदभाव, द्वेषभाव हे देशमुखांना कालसापेक्षतेच्या नावा-खाली योग्य वाटत असतील तर त्यांनी खुशाल वाटू द्यावे, मी तसे करू शकत नाही.
समाजात बुरसटलेल्या विचारांची, जातीयवादी प्रवृत्तीची कांही तथाकथित मंडळी लोकांचा बुद्धिभेद सातत्याने करीत असतात. त्यांचे अमानवी विचार हाणून पाडणे हेच परिवर्तनवाद्यांसमोरील आजचे खरे आव्हान आहे.
-शिवाजी कांबळे
सोनानगर, लातूर
No comments:
Post a Comment