Wednesday, July 16, 2014

वैदिकांचा ‘ प्रताप ‘

काही वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल भागातील एका पत्रकाराने एका नक्षलवाद्याची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या पत्रकाराला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली होती. आता तर  मोस्ट वॉण्टेड कुख्यात अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याची वेद प्रताप वैदिक या ज्येष्ठ पत्रकाराने पाकिस्तानात जाऊन लाहोरमध्ये मुलाखत घेतली.
एवढेच नाही तर तेथील डॉन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मग याबाबत सरकार आपले हात वर करून कातडीबचाव धोरण का अवलंबित आहे?  हा प्रश्न कोणाही सर्वसामान्य
माणसाला पडू शकतो. या वैदिक-सईद भेटीवरून सोमवारी आणि मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गोंधळ झाला. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला वैदिक-सईद भेटीबाबतचे स्पष्टीकरण मागितले. वैदिक आणि हफिज सईद यांच्यात काय चर्चा झाली ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून वैदिक यांनी हफिजची भेट घेतली काय ? भारतीय दूतावासाने ही भेट घडवून आणली का ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला संसदेत धारेवर धरले.  याच दहशतवादाच्या मुद्यावरून याआधीच्या संपुआ सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने जोरदार हल्ले चढविले होते. आता फक्त बाजू बदलली आहे. काँग्रेसचे महासचिव दिग्विजयqसग यांनी वैदिक-सईद भेटीचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत वैदिक यांनी सईदसोबत कोणती चर्चा केली हे देशातील जनतेला कळलेच पाहिजे. शिवाय वैदिक यांना अटक करावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र वैदिक आणि सईद भेटीशी सरकारचा काडीमात्र संबंध नसल्याचे सरकारतर्फे दोन्ही सभागृहांत सांगण्यात आले. सभागृहाबाहेरही भाजपचे नेते, मंत्री वैदिक आणि सईद भेटीचा सरकारशी काही संबंध नसून वैदिक यांनी व्यक्तिगतरीत्या स्वतंत्र पत्रकार म्हणून त्यांची भेट घेतली आहे. पत्रकार म्हणून त्यांना कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे. भेट घेणे हा देशद्रोह नाही.  पण काश्मीरला स्वतंत्र करण्यास हरकत नाही, हे वैदिक यांचे विधान कोणी मान्य करणार नाही, अशा प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून व्यक्त केल्या जात आहेत. परंतु पाकिस्तानातील ज्या ‘डॉनङ्क न्यूज चॅनलच्या पत्रकाराने वैदिक यांची मुलाखत घेतली त्या इफ्तिखार शिराजी यांनीच सांगितले की, भारतीय पत्रकार वैदिक जर व्यक्तिगतरीत्या सईदच्या
मुलाखतीसाठी आले असते तर येथील भारतीय दूतावासाने त्यांचे एवढे आदरातिथ्य कसे काय केले? शिवाय वैदिक यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेटही घेतली. तसेच ‘डॉनङ्क न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आहोत, लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपसाठी आपण कॅम्पेन केल्याचेही सांगितले. या सगळ्या बाबींवरून वैदिक हे मोदींचे दूत म्हणून सईद याच्या भेटीला गेले नसतील कशावरून? त्यामुळे केंद्र सरकारने याचे स्पष्टीकरण दिलेच पाहिजे.  काँग्रेससह शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपानेही वैदिक-सईद भेटीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर आक्रमक प्रतिक्रिया दिली असून वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्यक्ती असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच भारतीय दूतावासाला वैदिक-हाफिज सईदच्या भेटीबद्दल माहिती होती की त्यांनीच ही भेट घडवून आणली, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विषयावरून संसदेतही चांगलेच पडसाद उमटत आहेत. काहीही असले तरी वैदिक आणि हफिज सईद यांच्या भेटीचे गौडबंगाल काय हे उघड झाले पाहिजे. या प्रकरणाचे राजकीय रहस्य असेल तर तेही स्पष्ट झाले पाहिजे. कारण हा विषय देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा  आणि गंभीर असा आहे.

                                                                                          पूर्वप्रसिद्ध : दैनिक एकमत, लातूर

No comments:

Post a Comment

Translate