Tuesday, July 16, 2013

दहावीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात चुकांची सेन्चुरी !


                                              शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा कळस
                                                                 शिवाजी कांबळे
लातूर :  राज्य शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिर्मित शालेय अभ्यासक्रमांच्या अनेक पुस्तकातील गंभीर चुका यावर्षी चव्हाट्यावर आल्या आहेत. आता दहावी वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी तृतीय भाषेच्या पाठ्यपुस्तकात शेकडो गंभीर चुका आढळून आल्या असून याचा थेट परिणाम विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर होत आहे.
त्यामुळे अशा चुकांना जबाबदार असणाèया दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. 
    गेल्या काही दिवसांत पाठ्यपुस्तकांमधील काही चुकांवरून वादळ उठले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाला इतिहास, भूगोलची मंडळे बरखास्त करावी लागली. नवव्या वर्गाच्या qहदीच्या पुस्तकातही अक्षम्य चुका समोर आल्या. आता २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून दहावी वर्गाच्या अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या  'English Reader A Coursebook in English (Standard X) ' या पाठ्यपुस्तकात १०१ चुका आढळून आल्या आहेत. शिक्षण मंडळातील तज्ज्ञ लेखक, शिक्षकांकडून छाननी, पुनर्विलोकन करून हे पुस्तक निर्दोष झाल्याचा दावा पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात या पुस्तकात गंभीर चुकांचा समावेश आहे.  अगदी ऋणनिर्देशात पृष्ठ क्र. ४ पासून ते शेवटचे पृष्ठ क्र. २०६ पर्यंत शब्दांचे स्पेलिंग (वर्णरचना), विरामचिन्हे, शब्दकोडे, पुनरावृत्ती, व्याकरण व अस्थानी छपाईत विविध प्रकारच्या शंभरावर चुका आहेत. प्रामुख्याने पृष्ठ क्र.४ वर Acknowledgement  मधील तिस-या परिच्छेदातील शेवटच्या ओळीतीर्ल  subsequent या शब्दातील"b' हे अक्षर गायब आहे. पृष्ठ क्र. १० वरApproach , Method and Techniques या शीर्षकाखालील सहाव्या ओळीच्या परिच्छेदात एकूण चार चुका आहेत. त्यात Maharashtra State या दोन शब्दांमध्ये ऑब्लिक (/) या चिन्हाची गरज नसताना टाकण्यात आले आहे. नियमानुसार साधा वर्तमानकाळाच्या वाक्यातील कर्ता एकवचनी व तृतीयपुरुषी असेल तरच त्यापुढे येणा-या  मुख्य क्रियापदास  "s ' प्रत्यय लागतो. मात्र येथे Underscores  असे छापण्यात आले आहे. पान क्र. ९ वर Approach , Method  या शीर्षकाखालील सहाव्या ओळीत practise  ऐवजी practice असे चुकीचे स्पेqलग छापले आहे. पान क्र. ५ वरA 8 Part II Q. 1 मध्ये  Result ऐवजी Reason असा चुकीचा शब्द छापण्यात आला आहे. पान क्र. १४ वरही अशीच चुक आहे.Traveller  ऐवजी  Traveler  अशी स्पेqलगमध्ये चुक आहे. पान क्र. ३० वर chidiya ऐवजी chidya, पान क्र. ३३ वर made  ऐवजी mad असे छापले आहे. अशा अनेक प्रकारच्या चुका या पुस्तकात आहेत. या चुकांच्या गोंधळामुळे विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक दर्जावर विपरित परिणाम होत असून शिक्षण खात्याने तात्काळ या चुकांची दखल घेऊन चुकांसाठी दोषींवर कारवाई करावी आणि  दुरुस्तीची उपाययोजना करावी किंवा पुस्तक बदलून द्यावे, अशी मागणी सुजाण पालक व शिक्षणप्रेमी जनतेतून केली जात आहे. 
बॉक्स..............
माजी गटशिक्षणाधिका-यांनी केली चुकांची यादी
३५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्त झालेले आणि देवणीचे माजी गटशिक्षणाधिकारी माणिक वाघमारे यांनी या दहावीच्या इंग्रजी पुस्तकातील चुका शोधून काढल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी १०१ चुकांची यादीच तयार केली असून अपेक्षित दुरुस्त्याही सूचविल्या आहेत. ‘माझ्या ३५ वर्षांच्या इंग्रजी अध्यापन कारकिर्दीत कोणत्याच क्रमिक पुस्तकात एवढ्या चुका आढळून आलेल्या नाहीत.ङ्क असे त्यांनी म्हटले आहे.  

Saturday, July 6, 2013

मस्ती, मजा आणि धमाल म्हणजे ‘फेकमफाक' : भरत जाधव



......................................
 एमईएफएसी प्रॉडक्शन्स निर्मिती संस्थेचा पहिलाच चित्रपट ‘फेकमफाक' हा १२ जुलैला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार  अभिनेता भरत जाधव हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्या निमित्ताने दै. एकमतशी त्याने या चित्रपटाबद्दल आणि इतरही विषयावर  दूरध्वनीवरुन मनमोकळ्या गप्पा मारल्या.   ‘फेकमफाकङ्क चित्रपट हा मस्ती, मजा आणि धमाल करणाèया थापाड्याची एक कहाणी असून ती लोकांनी आवर्जून पाहावी आणि आनंद घ्यावा, असे त्याने आवर्जून सांगितले.
......................................................................
प्रश्न : ‘फेकमफाकङ्क चित्रपटाबद्दल सांगा,  आपण या चित्रपटात कोणती भूमिका साकारली आहे?
 - दयानंद राजन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मी, ऋचिता जाधव, विजय चव्हाण, विजू खोटे आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात आहेत. सस्पेन्स कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट असून   माझी भूमिका गोपीनाथ देसाई नामक मस्ती, मजा आणि धमाल करणाèया हाका मारत वस्तू विक्रेत्याची आहे. तो सतत थापा मारत असतो, त्यातून लोकांचे मनोरंजन करतो. पुढे त्याची एक थाप खरी ठरते आणि त्यातून सस्पेन्स थ्रिलर निर्माण होते. तेथूनच चित्रपट नवे वळण घेतो.
प्रश्न : या चित्रपटात तुमच्या कॅरेक्टरमध्ये
 नेहमीपेक्षा काही वेगळेपण आहे ?
- वेगळेपण आहे म्हणून चित्रपट बघायला लोक येत नाहीत. निखळ मनोरंजन हाच त्याचा उद्देश असतो. माझ्या भूमिकेत गरजेप्रमाणे वेगळेपण असतेच. भूमिकेशी समरसता महत्त्वाची आहे.
प्रश्न : कोणत्या वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट खेचून आणेल असे तुम्हाला वाटते ?
-  सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी एकत्र बसून बघायला हरकत नाही. शहरात फिरुन हाका मारीत विविध वस्तू विक्री करणारे हा चित्रपट एॅन्जॉय करतील.
प्रश्न : कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला तुम्हाल आवडतात ?  
- सगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात.
प्रश्न : हिन्दी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नाही का?
- थोड्याच दिवसांत न्यूज कळेल. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
प्रश्न :  मराठी चित्रपटाचा चेह
रा बदलला आहे काय?  काय वाटते?
- निश्चितच ! प्रेक्षक मराठी मराठी चित्रपटाची दखल घेत आहेत. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट जगभर पोहचत आहेत. तुम्हाला काय वाटते, तेच माझेही मत आहे.
प्रश्न : ‘कुणी घर देता का घरङ्क नंतर ‘फेकमफाक' बद्दल   काय अपेक्षा आहेत?
-  कुठलाही चित्रपट चालला पाहिजे.लोकांनी हा चित्रपट पाहावा, अशीच अपेक्षा आहे. हा चित्रपटातील विनोदी पात्रांमुळे प्रेक्षक खळखळून हसतील.शिवाय रहस्य आणि थ्रिलरमुळे त्यांना धक्के ही बसतील. या चित्रपटात चार गाणी असून सध्या गाजत असलेले अ‍ॅटम साँग वैशाली सामंतने गायिले आहे. तर अन्य गाणी साधना सरगम आणि शान यांनी गायिली आहेत. तर भरत बलवली हे उमदे संगीतकार आहेत.

                                                                       -  शिवाजी कांबळे                                                              
       ९०११३०८५८०

संगीत क्षेत्रातला ‘एकलव्य'


 जी माणसे विविध क्षेत्रात मोठी झाली. ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. ती बहुतांश माणसं मूळची खरी ग्रामीण भागातलीच. पण काही माणसं स्टार झाली की गावच्या मातीला विसरतात. तर काहींना त्यांची जाण असते.  सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव म्हणतात ना, मातीत जगावं, मातीत मरावं, बाळा, माती लई थोर तिला कसं विसरावं?     तसंच सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातील उपळा दुमाला या लहानशा गावचा लक्ष्मण अंकुश नाईकवाडी हा युवक आज संगीत क्षेत्रात आपल्या ‘ हर पल तेराही नशाङ्क, मनवारा, तुझ्याविना या आठ गाण्यांच्या तीन अल्बमने उजेडात आला आला आहे. खेड्या राहून शेतातली सर्व कामे करुन त्यानं संगीत क्षेत्रात भरारी घेतली आहे. मुंबई-पुण्याच्या मोठ मोठ्या संगीतकार आणि गीतकारांनी त्याची दखल घेतली आहे. ग्रामीण मातीशी नांत सांगणारा कवी, गीतकार आणि संगीतकार त्याच्या रुपाने उदयास येत आहे. तो संघर्ष करतो आहे, शिकतो आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी. म्हणून  कुणब्याची मुलं आता कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता लढायला शिकत आहेत. प्रतिकुल परिस्थितीत लक्ष्मणने बार्शीच्या शिवाजी कॉलेजात बारावी पर्यंतचे कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने सांगली येथे इंजिनिअरींगचे दोन वर्षे शिक्षण घेतलं पण ते अपुरेच राहीले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो आपले शिक्षण पूर्ण करु शकला नाही. पण मनाने न खचता त्याने गावाकडची कोरडवाहू दहा एकर शेती सांभाळली. शेतीत घाम गाळून आपल्या गीत-संगीताचा छंद जोपासू लागला. खेड्यात रेडिओशिवाय कोणतं साधन नव्हतं. तो रेडिओवर विविध गाणी ऐकायचा. यातूनच तो संगीताच्या प्रेमात पडला. तो स्वत: गाणी लिहितो, कंपोज करतो आणि गातोही. सुरुवातीला त्यानं लातूरच्या एका छोट्याशा स्टुडिओमध्ये ‘तुझ्याविना...ङ्क नावाचा गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला. तो २००५ मध्ये मुंबई आकाशवाणीवरुन प्रसारित झाला. तेव्हा लक्ष्मणला आकाश ठेंगणे झाले होते. त्यानंतर ‘ मनवाराङ्क हा  अल्बम २०११ मध्ये फाउंटेन म्युझिक कंपनीने प्रसारित केला. त्यापूर्वी २००८ -०९ मध्ये तयार केलेला ‘हर पल तेराही नशाङ्क हा हिंदी गाण्यांचा अल्बम तब्बल चार वर्षांनंतर रसिकांच्या सेवेत सादर झाला. हा अल्बम ऑनलाईन   प्रकाशित झाला आहे. या तिनही अल्बमची रॉयल्टी अजून त्याला मिळालेली नाही. पण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुझ्या प्रवासात...ङ्क हा आणखी एक गाण्यांचा अल्बम लवकरच येणार आहे. मात्र आयुष्यात एखाद्या आव्हानात्मक कामात कोणाच्या आधाराची गरज असते,पण कुणाचाही आधार नसल्याची खंत लक्ष्मणने व्यक्त केली. मात्र संगीतकार मिqलद इंगळे यांनी आपणास खूप मदत  केली, गाण्यांसाठी मार्गदर्शन केले. शिवाय निखिल विनय, लेस्ली या मान्यवरांनी आपणास खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी मनापासून जे आवडते त्यामध्येच करिअर करावे, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते. अशी लक्ष्मणची धारणा आहे.
लक्ष्मण नाईकवाडी शेवटी म्हणतो...
 ‘सोबती होती खरी होती
 का तिला नाकारले मी
नेम का तेव्हा कुणाचा हात मी
शोधित होतो.ङ्क

                                                                        -शिवाजी कांबळे                                                                  
                                                                           ९०११३०८५८०

Saturday, June 8, 2013

‘ नालंदा ' चे पुनरुज्जीवन !


........................................................
इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदान आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य करीत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘नालंदाङ्क विद्यापीठ  परत उजेडात येत आहे. कारण या ऐतिहासिक विद्याठाची पुनस्र्थापना हा तमाम पूर्व अशियायी देशांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारतातील गतकाळातील ज्ञानवैभवाला नवजीवन मिळावे, या हेतूने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी परराष्ट्र मंत्री तथा विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेची कल्पना मूर्त रुप घेत आहे.नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठाला नवाजन्म देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे केवळ ग्रंथ जाळल्याने ज्ञानाचे पलिते कायमचे विझत नाहीत, हा संदेश नवे नालंदा अनेक शतके जगाला देत राहील...
..................................................
भारताची शैक्षणिक परंपरा एकेकाळी  मोठी वैभवशाली होती. तब्बल आठराशे वर्षांपर्यंत भारतीय विद्यापीठांचा जगाच्या शिक्षण पद्धतीवर मोठा प्रभाव होता. याला इतिहास साक्षी आहे. नालंदा,तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, सोमपुरा आणि उदांतपुरी अशी जगविख्यात विद्यापीठे होती. या विद्यापीठांमधून ज्ञानार्जनाबरोबरच संशोधनाचे कार्य होत असे. अनेक देशातून लोक ज्ञानार्जनासाठी या विद्यापीठांत येत असत. मात्र आजमितीला देशातील उच्च शिक्षणाला उतरती कळा लागली आहे. जगाच्या सर्वोच्च दोनशे विद्यापीठांच्या यादीत तर भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, ही बाब भारतीयांची मान शरमेने खाली जाण्यासारखी आहे. एवढेच नाही तर उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवतेचे  आजचे चित्र धुसर आणि दिवाळखोरीचे दिसत आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अमुलाग्र असा बदल करण्याची खरी गरज आहे.
 उच्च शिक्षणातील मागासलेपणाबद्दल नुकतेच आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शिक्षणाच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. परंतु त्यांच्या आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून बिहारमधील प्राचीन आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरु आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली   समिती हे विद्यापीठ उभारणीचे काम करुन नवा इतिहास घडविण्यासाठी सरसावली आहे.  ही एक तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. नव्या नालंदा विद्यापीठाचे वास्तुचित्र आणि आराखडा तयार करण्यात येत आहे. एकेकाळी जगातील सर्वात मोठे पहिले विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या या विद्यापीठात चौथ्या इसवी सनाच्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत या विद्यापीठात अखंडपणे ज्ञानार्जन आणि संशोधनाचे कार्य सुरु होते. या काळात हे विद्यापीठ विद्यार्थी आणि अध्यापकांनी गजबजलेले होते. बौद्ध धम्माचे आणि इतर धर्मिय देशोदशीचे  विद्यार्थी विविध विषयांचा विविध भाषांमधून अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येऊन आपल्या ज्ञानाची भूक भागवित. या विद्यापीठाद्वारे  चीन, जपान व्हिएतनाम, थायलंडस, दक्षिण कोरियासह आशिया खंडाच्या अनेक देशात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. या विद्यापीठात दहा हजाराहुन अधिक विद्यार्थी आणि दोन हजार अध्यापक ज्ञानार्जन  आणि ज्ञानदानाचे काम करत. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, वेदविद्या शिवाय बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन अलिशान इमारतीमध्ये ग्रंथालय होते. हे ग्रंथालय नऊ मजल्यांचे होते. त्यामध्ये ३ लाखांपेक्षाही अधिक ग्रंथसंग्रह होता.  हे विद्यापीठ म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य कलेचा अद्भूत नमूना होते. आवारात अनेक स्तूप आणि बुद्ध विहार होते. या विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या सुंदर मूर्ती होत्या. रत्नांनी चमचमणारी दालने होती. तीनशे खोल्या होत्या, त्यामध्येच व्याख्याने व्हायची. उत्तुंग इमारती आणि आंब्यांची झाडे होती. कनोजचा राज हर्षवर्धन आणि पाल राजाचा राजाश्रय या विद्यापीठाला मिळाला होता. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्त्पन्नातून आणि राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. येथील विद्याथ्र्यांना निवासाबरोबरच भोजन, कपडे, औषधोपचार असे सारे काही विनामूल्य मिळत असे. इथले विद्यार्थी होतकरु, ज्ञानपिपासू तर शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न होते. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. जगभरात ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाची श्रेष्ठ अशी परंपरा निर्माण करण्यात नालंदाचे मोठे योगदान आहे. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांनी नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेटी दिल्याचा इतिहास पाली भाषेतील नोंदीत सापडलेला आहे. चीनी प्रवासी ह्युएन त्संग (इ.स.६११ ते ६४४)  नालंदात ज्ञानार्जनासाठी आले होते, त्यांनी काहीवर्षे या विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी विपूल लेखन केले. त्यांनी लिहून ठेवलेल्या ‘जर्नी टू द वेस्ट‘ या इंग्रजी गं्रथात नालंदाबद्दल सविस्तर माहिती मिळते. तसेचतारनाथाने लिहिलेल्या बौदध धम्माच्या इतिहासातही नालंदाचा उल्लेख सापडतो.   नालंदा विद्यापीठाची सुरुवात झाली ती चौथ्या शतकात गुप्त वंशाच्या कुमारगुप्त या राजापासून.         मात्र त्याआधीही नालंदा अस्तित्वात  असल्याचे उल्लेख सापडतात. सम्राट अशोकाने  (इ.स.पूर्व २०० वर्षे) नालंदाच्या परिसरात बुद्ध विहार बांधले होते. मात्र साèया जगाला अभिमान वाटावा, असे हे विद्यापीठ सन ११९९ मध्ये धर्मांध तुर्की मोहम्मद बख्तियार या आक्रमकाने पेटवून उध्वस्त केले. या विद्यापीठातील अमाप असा गं्रथसाठा तब्बल सहा महिन्यापर्यंत जळत होता.  या ऐतिहासिक विद्यापीठाचा शोध एकोणिसाव्या शतकात १८६१ मध्ये ब्रिटीश व्हॉईसराय कqनगहॅम यांनी लावला. या परिसराचे सलग दहा वर्षे उत्खनन करण्यात आले. त्यात नालंदा हा खजिनाच सापडला. मात्र आता या वैभवशाली विद्यापीठाच्या ठिकाणी जो परिसर दिसतो तो भग्न अवशेष परिसर आहे. त्याकाळच्या भव्यतेच्या आणि संपन्नतेची आजही आठवण करुन देणारा. विसाव्या शतकात नालंदा एज्युकेशन फाउंडेशनने १९८६ मध्ये नालंदा विद्यापीठाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला तत्कालीन केंद्रीय मंत्री व्ही.एन. गाडगीळ आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा उपस्थित होते. त्यानंतर नालंदा विद्यापीठात २००४ पर्यंत शैक्षणिक कार्य सुरु होते. विद्यापीठाकडे सीबीएसईची संलग्नता होती. त्यानंतर जमीनीचा वाद न्यायालयात गेला आणि विद्यापीठातील शैक्षणिक कार्य बंद पडले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाची नव्याने उभारणी व्हावी, अशी अपेक्षा काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. सन २००६ च्या पूर्व अशियाई देशांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मनमोहनqसग यांनी ती बोलून दाखवली. पौर्वात्य देशांनी ती उचलून धरली. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी त्यासाठी पुढकार घेऊन ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती नेमली. नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अर्मत्य सेन यांनी समितीचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. भारत, चीन, जपान या सर्व देशांनी त्याला पाठींबा दिला.  पूर्व अशियाई देशांच्या या शिखर परिषदेमधील अनेक कलमांमध्ये नालंदाच्या उभारणीचा समावेश करण्यात आला. भारतीय संसदेपुढे त्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. मध्यंतरी अर्मत्य सेन यांनी पंतप्रधान मनमोहनqसग यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तत्काळ संमती दिली. इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे. qसगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो यांनी या विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला आहे आणि इतर पौर्वात्य देशांनी त्याला दुजोरा दिला आहे. विद्यापीठाच्या उभारणीच्या दृष्टीने कामाला सुुरुवातही झालेली आहे. नव्या नालंदा विद्यापीठासाठी ४५० एकरहून अधिक जागा घेण्यात आली आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे ५००० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी निम्मी रक्कम इमारतींच्या बांधकामासाठी आणि उर्वरित रक्कम विद्यापीठाचे अवशेषांचे आधुनिकीकरण, सोयी-सुविधांनी कार्यक्षम बनविण्यासाठी वापरली जाणार आहे. जपान आणि qसगापूर या देशांनी प्रत्येकी पाचशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यापीठाच्या स्थापनेत सोळा देश सामील होणार आहेत. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम पदव्युत्तर राहणार असून बौद्ध धम्माचे अध्यायन, तर्कशास्त्र, विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास, तत्त्ववाद, उत्खनन, कृषी, आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार, भाषा, साहित्य, विज्ञान या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. प्रामुख्याने कृषी विषयावर अधिक भर देण्याची भूमीका राष्ट्रपती मुखर्जी यांची आहे.
या नालंदा विद्यापीठाच्या पुनस्र्थापनेमुळे इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात देश पुन्हा उभारी घेईल, शिवाय भारताचे पौर्वात्य देशांसोबतचे संबंध दृढ होण्यासाठी हे विद्यापीठ दुवा ठरेल. यात शंका नाही.
                                                                                 -शिवाजी कांबळे
                                                                                   ९०११३०८५८०                                                                                                                                                                                                                                    

Wednesday, June 5, 2013

लातूरचा ‘ हिरा'


परवा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूर मुक्कामी एका कार्यक्रमात म्हटले होते की, लातूर हे मराठवाड्यातील ऑक्सफर्ड आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न पुढे आणला. पण आता स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यातील सहा मुलांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या परीक्षेत उत्तीर्ण होणं साधी बाब नाही. अशा या देशातील सर्वोच्च परीक्षेत देशात पंधरावा येणारा कौस्तुभ चंद्रप्रकाश दिवेगावकर त्यापैकीच एक यशोदिप.
रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे त्याचे गाव. वडिल शेती करुन होमिओपॅथी प्रॅक्टीस रतात. तर आई गृहिणी आहे. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील कौस्तुभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. कौस्तुभचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्याच मिqलद महाविद्यालयात घेतले. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्याने कला शाखेत  मराठी विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं नंतर त्याने औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.कौस्तुभने २०१२ मध्ये झालेल्या युपीएससीच्या अंतीम परीक्षेत देशात १५ वी रँक मिळवली. त्याने अतुलनीय असं यश मिळवलं. कौस्तुभ आपल्या या यशाबद्दल सांगताना म्हणतो की, फुल-शाहू -आंबेडरी विचारांची प्रेरणा, आई-वडिलांचे आर्शिवाद आणि गुरुजणांचं मार्गदर्शन यामुळंच मी हे यश प्राप्त करु शकलो. युपीएससीसाठी त्याने मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र हे वैकल्पिक विषय घेतले होते. या विषयांचा अभ्यास करिअरसाठी आणि युपीएससीसाठी महत्त्वाचा वाटला. जाणीवपूर्व आणि डोळसपणे आपण समाजातील प्रश्नांकडं पाहणं आणि संवेदनशील असणं, हे युपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पोषक असल्याचं कौस्तुभने सांगितलं. आपणास युपीएससीच्या मुलाखतीत सद्धा साहित्य, शिक्षण आणि समाज याचा संबंध, यावरच अधिक प्रश्न विचारण्यात आले. अभ्यासाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, मी स्वत:चे नोट्स काढले, गाईडचा वापर केला नाही. अभ्यास रोज किती तास करायचा, असं काही निश्चिीत नव्हतं, पण किमान चार-पाच तास अभ्यास करत होतो. एनसीआरटी आणि महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकांचा उपयोग केला. फ्रंटलाइन, हिंदू सारखी वृतपत्रं आणि मुलाखतीच्या दरम्यान महाराष्ट्र शासनाचे लोकराज्याच्या वाचनाचा खूप फायदा झाला. परीक्षेचा काळ हा खडतर काळ असतो, पण या काळात नाउमेद न होता तयारी केली पाहिजे. कारण ही परीक्षा म्हणजे एक प्रकारे मानसिक कणखरतेचीच असते. अशा स्पर्धा परीक्षेकडे येणाèया विद्याथ्र्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता पुढे आले पाहिजे. मराठीतही अभ्यास साहित्य भरपूर उपलब्ध आहे. त्याचा फायदा स्पर्धा परीक्षेत उतरु इच्छिणाèया विद्याथ्र्यांनी घ्यायला हवा. असा संदेश त्याने आजच्या तरुणाईला दिला आहे.
                                                                                   
                                                                                  -शिवाजी कांबळे
                                                                                    ९०११३०८५८०

Saturday, June 1, 2013

राष्ट्रपती प्रणवदा मराठवाडा भेटीवर


..........................................
देशाचे राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी हे आज (शुक्रवार)लातूरात येत आहेत. शहरातील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला ते शनिवारी हजर राहणार असून राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच मराठवाड्यात येत आहेत, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाची थोडक्यात ओळख करुन देणारा हा मागोवा...
.......................................................
लातूरचे भाग्यविधाते, लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लातूरला आल्या होत्या. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. आता विलासराव साहेबांशिवायच्या लातूरात देशाचे विद्यमान राष्ट्रपती श्रीमान प्रणव मुखर्जी येत आहेत. साहेबांच्या गावात श्रीमान मुखर्जी यांच्या स्वागताचीही जंगी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या या दौèयाला लातूरकरांची भावनिक किनारही जुळली गेलेली आहे. प्रणव मुखर्जी उर्र्फ प्रणवदा गतवर्षी जुलै महिन्यात देशाचे तेरावे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फाशीच्या सर्व दया याचिका निकाली काढून देशाच्या या सर्वोच्च पदावरही त्यांनी आपल्या निर्णय क्षमतेची झलक दाखवून दिली.  पक्षीय राजकारणातही ते तेवढेच सक्रिय राहीले. त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय जीवनात देशपातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाèया  यशस्वीपणे पेलल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील मिराती या लहानशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या श्रीमान प्रणवदांना लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांचे पिता qककर मुखर्जी यांच्याकडून मिळाले होते. त्यांचे पिता qककर मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंजार स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीत बंड केल्याने त्यांनी दहा वर्षे तुरुंगवासही भोगला होता. शिवाय ते १९२० पासून कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाल्यानंतर पश्चिम बंगाल विधान परिषदेचे तब्बल बारा वर्षे सदस्य होते. शिवाय वीरभूम जिल्ह्याचे कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्षही होते. त्यामुळे श्रीमान प्रणवदांची जडणघडण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपसुकच होत गेली. सूरी विद्यासागर महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. कोलकाता विद्यापीठात त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र पदव्युत्तर शिक्षणासोबतच कायद्याची पदवी प्राप्त केली.
 वकिल, प्राध्यापक, पत्रकार
ते वकिल आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काहीकाळ सेवा केली. मातृभूमी की पुकार या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिताही केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना साहित्यामध्येही रुची होती. बंगीय साहित्य परिषदचे विश्वस्त आणि अखिल भारतीय बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. श्रीमान प्रणवदांनी १९८४ मध्ये बियॉंड सव्र्हायवल :  एमर्जिंग डायमेंशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, १९८७ मध्ये ऑफ द टेक, १९९२ मध्ये सागा ऑफ स्ट्रगल अ‍ँड सॅक्रिफाइस आणि १९९२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरील चॅलेंजेस बिफोर द नेशन या ग्रंथांचे लेखन केले. साहित्यिक आणि लेखक म्हणूनही त्यांनी आपला ठसा या क्षेत्रात त्यांनी उमटवलेला आहे.
राजकीय वाटचाल
श्रीमान प्रणदांना काँग्रेस पक्षांतर्गत आणि सामाजिक  धोरणांमध्येही त्यांना सन्मान मिळाला आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी १९६९ मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य म्हणून झाली. ते १९७३ पर्यत पाचही वेळेस राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते औद्योगिक विकास खात्याचे केंद्रीय उपमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील झाले. १९८२-८४ दरम्यान कॅबिनेट पदावर होते आणि १९८४ मध्ये ते देशाचे अर्थमंत्री बनले. याचवर्षी जगातील सर्वात सक्षम आणि चांगल्या पाच अर्थमंत्र्यांमध्ये त्यांची गणना युरोमनी पत्रिकेने केलेल्या सव्र्हेक्षणात करण्यात आली. ते याच काळात पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. प्रणवदा अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनqसग हे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र ते पक्षांतर्गत कलहामुळे मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकले नाही. काही काळासाठी त्यांना काँग्रे पक्षातून निष्काषित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत समझोता झाल्याने त्यांनी आपल्या समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. त्यामुळे प्रणवदांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन झाले. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरqसह राव यांच्या कार्यकाळात  नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बनले त्यानंतर ते पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री झाले. १९९७ मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला. सन २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसे संयुक्त पुरोगामी आघाडी निर्माण करुन सर्व समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवले. तेव्हा राज्यसभा सदस्य मनमोहनqसग हे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून प्रणवदा पहिल्यांदा लोकसभा निवडणुक qजकले आणि त्यांना सभागृह नेता बनविण्यात आले. त्यांना संरक्षण, अर्थ, परराष्ट्र विषयक मंत्रालय, राजस्व, परिवहन, दूरसंचार, वाणिज्य आणि उद्योगासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रालयाचे मंत्री म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. अत्यंत कार्यकुशलतेने त्यांनी या मंत्रालयांमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली. काँग्रेस संसदीय समितीचेही त्यांनी नेतृत्व केलेले आहे. काँग्रेस मंत्रिमंडळाच्या कामकाजात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
आंतरराष्ट्रीय पदांवर कार्य
प्रणवदांनी विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्येही त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. ते बोर्ड ऑफ गव्हर्नसचे सदस्य होते. शिवाय आंतरराष्ट्रीय नाणे निधी, वल्र्ड बँक, एशियन विकास बँक, अफ्रिकन विकास बँकेचे सदस्य म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे.२४ आंतरराष्ट्रीय नाणे निधी मंत्रिमंडळ (आयएमएफ आणि वल्र्ड बँकेशी संबंधित) समूहाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. मे १९९५ आणि नोव्हेंबर १९८५ मध्ये ते सार्क परिषदेचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा त्यांना गाढा अभ्यास आहे.
पक्ष निष्ठावंत
 काँग्रेसमध्ये त्यांची प्रतिमा पक्ष निष्ठावंत वरिष्ठ नेत्यांची आहे. पक्षात त्यांना मोठे मानाचे स्थान आहे. मीडियातून त्यांना दांडगी स्मरणशक्ती असलेला आणि आपले आस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणारा राजकीय नेता म्हूणन संबोधले जाते. जेव्हा सोनिया गांधी यांना राजकारणात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा नव्हती तेव्हा ज्या वरिष्ठांनी सोनिया गांधी यांना राजकारणात येण्यास राजी केले त्यापैकी  प्रणवदा हे एक आहेत. प्रणवदांची अमोघ निष्ठा आणि पात्रतेने त्यांना विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहनसिेंग यांच्या निकट आणले. त्यामुळेच ते २००४ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री बनले. २००५ मध्ये पेटंट सुधारणा विधेयकावरील समझोत्या दरम्यान त्यांच्या प्रतिभेचे दर्शन झाले. काँग्रेस हे महत्त्वपूर्ण विधेयक पारित करण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र संपुआमधील घटक पक्ष असलेल्या डाव्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. तेव्हा संरक्षण मंत्री असताना प्रणवदांनी विरोधकांशी चर्चा करुन यावर तोडगा काढला आणि अखेर २३ मार्च २००५ ला हे विधेयक मंजुर करण्यात आले. कोणत्याही अडचणीतून पक्षाला बाहेर काढायचे, संकटावर मात करायचे कसब प्रणवदांकडे आहे. त्यामुळे त्यांचे काँग्रेस पक्षातील महत्त्व आणखीनच वाढले.
 निष्कलंक व्यक्तिमत्त्व
 श्रीमान प्रणवदांच्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांची प्रतिमा स्वच्छ, निष्कलंक अशी राहीली. १९९८ मध्ये ते परराष्ट्र मंत्री असताना रीडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर श्रीमान प्रणवदा म्हणाले होते की, भ्रष्टाचार एक मुद्दा आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात आम्ही भ्रष्टाचार निपटून काढण्याचे आश्वान दिले आहे. मात्र मी हे सांगताना माफ करा की, हे घोटाळे केवळ काँग्रेस सरकारपर्यंतच मर्यादित नाहीत. खूप घोटाळे आहेत, विविध राजकीय पक्षांचे अनेक नेत्यांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे हे म्हणणे सहज आहे की, काँग्रेस सरकार सुद्धा या घोटाळ्यांमध्ये सहभागी होती. घोटाळ्यांच्या शुक्लकाष्ठापासून प्रणवदा मात्र कोसो दूरच राहीले. राजकारणात चारित्र्यवान राहण्याचा आणि राजकारण कसे करु नये आणि कसे करावे याचा एक आदर्श पायंडा पाडला. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या उमेदवारीला सवपक्षीयांनी पाठींबा दिला. हेच त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे यश आहे.
     देशाचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देशाची मान उंचावणारे मुत्सदीपणाने राजकारण करण्याचे प्रश्न असोत, प्रणवदांनी आपला ठसा भारतीय राजकारणावर उमटवून ठेवला आहे. सध्या देशाचे तेरावे राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळून आपल्या राजकीय जीवनातील यशोशिखर प्रणवदांनी गाठले आहे.

                                                                                         - शिवाजी कांबळे
                                                                                             ९०११३०८५८०
                                                                                          pub.dt. 31 may 2013

Wednesday, April 17, 2013

बाबासाहेब, आम्हाला माफ करा...



बाबासाहेब ! ज्यांना आपली सावली
सोबत घेऊन चालायची मुभा नव्हती,
अशांना तुम्ही त्यांची सावली दिलीत...अनिष्ट रुढी, परंपरांच्या नरकयातनांतून तुम्हीच मुक्ती दिलीत. अंधारात चाचपडणा-यांना तु
म्ही अत् दीप भव चा मंत्र दिलात. गावकुसाबाहेरचं उपेक्षेचं जिणं जगणा-यांना तुम्हीच माणसात आणलंत. मग  तुमची जयंती काय साधी होणार. मुळीच नाही. लोक विभूतीपूजा म्हणोत अथवा काहीही म्हणोत, जयंती जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. जयंतीचा भीमसागर पाहून कुणाचा पोटसूळ उठत असल तर खुशाल उठू द्या. बाबासाहेब, तुमच्या जयंती निमित्ताने महिनाभर प्रबोधनाचे कार्यक्रम होतात हे का टीकाकारांना माहित नाही.  तुमची जयंती दरवर्षी मोठ्या जल्लोषात 
साजरी करतोत. घामाघूम होईपर्यंत जयंतीच्या
मिरवणुकीत अंगात वारं शिरल्यागत नाचत नी घोषणा देत. बाबासाहेब, तुमची जयंती आमच्यासाठी दिवाळी
असते...   पण बाबासाहेब, एकाच गोष्टीचं वाईट वाटतय, तुम्हाला आम्हीच नाही तर विरोधकांनीही  आता चलनी नाणं करुन टाकलयं. आताशा सगळेचजण आपल्या स्वार्थासाठी तुमचे नाव घेतायत...
 बाबासाहेब , तुमच्यासह महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवराय या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करुन जातीयतेचं विष पेरलं जातेय. शिवाय सगळ्याच पातळ्यांवर तुमचे कांही अनुयायी तडजोडीच्या मार्गातून पळवाटा शोधताना दिसत आहेत. बाबासाहेब, तुमच्यानंतर या चळवळीचा रथ पुढे नेणारा
कोणी माईचा लाल अजूनतरी जन्माला आला नाही.
तुमचा परिवर्तनाचा रथ  पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचाच प्रयत्न या ना त्या कारणावरुन केला जातोय. तुमचा जयंती उत्सव हा आंबेडकरी चळवळीचा भाग होण्याऐवजी पारंपारिक कर्मकांडाचा भाग होऊ नये, याची काळजी घेताना कोणी दिसत नाही. तुमच्या अनुयायांमध्ये एकी राहीली नाही, तर बेकी निर्माण झालीय. एकाच गावात,
एकाच गल्लीत तुमच्या जयंतीच्या अनेक राहुट्या दिसतात. गटा-तटांनी चळवळीला पोखरले आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील आमचाच खरा पक्ष म्हणून वेगवेगळे मांडव टाकून तुमची जयंती साजरी करताना दिसतात. जयंतीच्या मंचावरुन आक्रमक भाषणे केली जातात. सलग अठरा तासांच्या अभ्यासाची नाटकं जयंतीनिमित्त केली
जातात आणि वर्षभर त्यादृष्टीने काहीच केले जात नाही.  त्यातून निष्पन्नही काहीच होताना दिसत नाही. एवढेच नाही तर तुमच्या आणि चळवळीच्या नावावर वर्गणी जमा करुन त्यातून काय केले जात, याचा हिशोबही समाजाला दिला जात नाही. याचा अर्थ असा नाही की, सगळेच तसे आहेत, काही अनुयायी तुमच्या विचारांवर काटेकोरपणे चालण्याचा प्रयत्न करणारेही आहेत, पण  तुरळकच...  तुम्ही दलितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करुन दिला अन् तुमच्याच विचारांचा, तत्वांचा पराभव होण्याइतपत कांही दलित नेत्यांचे वर्तन होताना दिसते. नेत्यांमधील अहंकारामुळं कोणीच कोणाला गिनत नाही. मै बडा मै बडा, या नेते आणि कार्यकत्र्यांच्या प्रवृत्तीमुळे आंबेडकरी चळवळीचेच नुकसान होतेय. हे कोणी कोणाला सांगायचे?

Translate